Popular Posts

Saturday, January 29, 2011

विचार....

बरेच दिवस झाले डोक्यात एक विचार फार ताप देतोय....माणसाला विचार आणि स्मृती ह्यांची खरच किती गरज असते.........? आणि जर त्या नसतील तर काही मोठा फरक पडणार आहे का?

काही दिवसांपूर्वी "50 फस्ट डेट्स" चित्रपट पहिला...खरं सांगतो, चित्रपट इतका अप्रतिम आहे कि अंगावर रोमांच उभे राहावेत किंवा डोळ्यातून पाणी यावं....मराठी चित्रपट "गोजिरी" पहिला असेल तर कथानक लक्षात येईलच....एका अपघातात short term memory loss  झालेली तरुणी आणि तिचा मनापासून सांभाळ करणारे तिचे नातेवाईक ....तिच्या मनापासून प्रेमात पडणारा नायक जो तिला भेटण्या आधी नाती..प्रेम...आणि एकंदरीतच स्त्रियांकडे मजा म्हणून पाहणारा आणि हि आयुष्यात आल्यानंतर तिला रोज आपल्या प्रेमात पडणारा (आणि पाणावलेल्या आपल्या  डोळ्यांच्या कडातून मनापासून येणारी आपली दाद घेऊन जाणारा) खराखुरा नायक...आणि अशक्य वाटावं इतकं त्या दोघांचं एकमेकांवरच प्रेम...


चित्रपट संपतो आणि माझ्या ओल्या पापण्याच्या अडून एक मनाचा प्रवास सुरु होतो.....मानवी मन, त्याच्या अनेक कडा, मानवी भावना, नाती आणि सरते शेवटी विचार आणि स्मृती ह्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान ह्यापाशी येऊन हा प्रवास थांबतो ... मी तशाच काहीशा न सावरलेल्या अवस्थेत ह्या मोठ्या jig saw puzzle ची मांडणी करायला लागतो....आता पुढे काही लिहित जाणार आहे त्याला काही निश्चित आणि मानवी चौकटीत बांधलेला निष्कर्ष येणार नाही पण मनात खूप विचार आले कि ब्लॉग लिहिणं सोयीस्कर वाटतं.

एक समाज, त्या सोबत येणारी आचार विचारांची चौकट, आणि दुर्दैवाने त्यासोबत येणारी बंधनं जी माणसाचं अख्खं जीवनच जखडून टाकतात...ह्या सगळ्याचा उगम माणसाच्या विचार करण्याच्या आणि स्मृती साठवण्याच्या प्रकृतीशी संबंधित आहे कि काय अशी शंका येते...काही स्मृती खरच निघून गेल्या तर छानच वाटणार असतं....नव्हे  कधी कधी तर काही स्मृती जपण्यापेक्षा फेकून दिलेल्या चांगल्या इथवर मनाची मजल गेलेली असते....आणि विचारांबद्दल काय बोलू...इतक्या प्रकारचे आणि अनंत ताऱ्हांचे विचार माणूस म्हणून आपल्या आयुष्यात असतात कि कधी कधी शंका येते कि माणसाचं जीवन कृतींपेक्षा विचारांनीच भरलेलं आहे काय...?????

ह्या दोन्ही गोष्टी मानवी जीवनातून वजा केल्या तर आयुष्य निदान "झेपेल" तरी..अर्थात मला इथे विचार आणि स्मृती गेल्यावर येणारा स्वैराचार अभिप्रेत नाही हि गोष्ट वेगळी.....पण तरीही पोकळी आणि धुंदी ह्या आपल्यातून कायमच्याच निघून जातील......नवीन वयात आलेल्या मुलाला (ज्याला अजून तारुण्य उपभोगायच म्हणजे काय हे पण समजलेलं नसतं) त्याच्या भावी करियरबद्दल बोलताना ऐका म्हणजे विचारांची आयुष्यावर बसलेली मगरमिठी जाणवेल.....आणि स्मृतींबद्दल काय सांगणार.....आपल्याला सोडून गेलेली मुलं त्यांच्या आयुष्यात आनंदात आहेत हे एकमेकांना अभिमानाने सांगणारे "एकटे" आई वडील पहा...

कधीकधी असं वाटत कि ह्या गोष्टी आयुष्यातून निघून गेल्या तर रोज एक "नवा" दिवस अनुभवता येईल...त्या दिवशी मिळणारा सुखद अनुभव, अपेक्षाभंगातून येणारी निराशा, यशाची धुंदी.....सगळं सगळं रात्री १२ च्या ठोक्याला संपून जाईल....आयुष्याच्या कधीच न कळणाऱ्या बेरजा वजाबाक्या फक्त त्या दिवसापुरत्या मर्यादित राहतील ....पण असं खरच होईल का????????? होणार नसेल तर can i at least have a delete button....?

1 comment:

  1. majja ch na.... smriti anhit, tar nasta dikhavyacha shahanpana nahi!
    kalpana chhanach ahe... chandrashekhar gokhale yanchi ek charoli athavli....

    "ithe veda asnyache
    khup fayde ahet,
    shahanyansathi jagnyache
    katekor kayde ahet! "

    ReplyDelete